जिल्ह्यात ५ दिवसात ७ जणी गायब..! पोलिसांना "सैराट" चा संशय; १९ वर्षांची माधुरी अन् १८ वर्षांची संजना गायब...!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवाळी झाली की दरवर्षी लग्नाळू मुले ,मुली गायब होण्याची संख्या जास्त वाढते. जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मुली किंवा मुले गायब झाल्यानंतर पालक पोलीस ठाण्यात तक्रार देतात,मात्र गायब झालेले मुले,  मुली सज्ञान असल्याने मिसिंग दाखल करण्याव्यतिरिक्त पोलिसांना अशा प्रकरणात फारसे काही करता येत नाही. मात्र बेपत्ता होणारी मुलगी किंवा मुलगा १८ वर्षापेक्षा कमी वयाचे असल्याचं पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करतात. मात्र १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली गायब झाल्या तर त्या लग्न करूनच परततात किंवा परत न येता दुसरीकडे  स्थायिक होतात असा पोलिसांचा अनुभव आहे. दरम्यान २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या ५ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणच्या ७ जणी बेपत्ता झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील दोघी विवाहित तर ५ जणी अविवाहित आहेत.

 कु. माधुरी अशोक मोरे(१९) ही गांधी चौक शेगाव येथून २६ नोव्हेंबरला गायब झाली. कु.निशा श्रीराम बघे(१९) ही शेगाव तालुक्यातील टाकळी धारव येथून २८ नोव्हेंबरला, कु. संजना आत्माराम ढोन (१८) ही मोताळा तालुक्यातील लिहा बु येथून २५ नोव्हेंबरला गायब झाली. कु. अंकिता सीताराम ढोकळ (१९) ही मोताळा तालुक्यातील तरोडा येथून तर वैष्णवी गजानन कव्हळे (२०) देऊळगाव राजा शहरातील साईनगरातून बेपत्ता झाली आहे. सौ. लक्ष्मी सचिन पवार(२३) ही विवाहिता दुसरबीड तर सौ. सपना प्रवीण हिवाळे (२६) चिखली तालुक्यातील केळवद येथून गायब झाली आहे.