एकीकडे हजारो लिटर पाणी वाया; दुसरीकडे गावात पाण्यासाठी भांडणं!; मलकापूर पांग्रातील अजब चित्र
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या मेन व्हॉल्ववरून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे पाणी वाया जात असताना दुसरीकडे मात्र गावात पाण्यावरून रोज वाद-विवाद होताना दिसतात.
या मेन व्हॉल्ववरून गावभरात पाणी सोडण्यात येते. पाणी सोडताना व्हॉल्व फिरवतात, त्यावेळेस व्हॉल्ववरून पाण्याचा मोठा लोंढा बाहेर येतो व पूर्ण गावातील रस्ते जलमय होऊन जातात. ज्यावेळेस व्हॉल्व बंद करण्यात येतो तेव्हा त्या ठिकाणी साचलेले घाण पाणी, ज्यावरून गाड्या येजा करतात, कुत्रे, मांजरे ते पाणी पितात तेच पाणी पुन्हा त्याच व्हॉल्वमध्ये परत जाते आणि पुन्हा तेच घाणपाणी घराघरात पोहोचते. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेन व्हॉल्ववरून होत असलेली गळती तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.