दिवठाणा गावात नेमकं काय घडलं? चिमुकल्यांना गुडघाभर चिखलातून जावं लागतंय शाळेत; संतप्त ग्रामस्थांनी पारावरच भरवली शाळा!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):चिखली तालुक्यातील दिवठाणा गावात शिक्षणासाठी जाणाऱ्या चिमुकल्यांची अक्षरशः परवड सुरू आहे. गावालगतच्या दत्तवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, "रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता?" असा प्रश्न पडावा. गुडघाभर चिखलातून वाट काढत शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गावच्या पारावरच शाळा भरवत प्रशासनाचा निषेध नोंदविला. दिवठाणा ते दत्तवाडी या रस्त्यावर सध्या चिखलाचं अक्षरशः साम्राज्य पसरलं आहे. शाळकरी लेकरांना रोज पाय रुतत-रुतत शाळेकडे जावं लागत आहे. एखादा पाय घसरला तर थेट चिखलात पडायची वेळ येते. पावसाळा सुरू होताच या रस्त्यावरून चालणं म्हणजे मोठी कसरतच बनली आहे. त्यामुळे पालकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

भर चिखलातून चालत शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पाय धुवायला साधी व्यवस्थाही नाही. त्यामुळे लेकरांना दिवसभर चिखलाने माखलेल्या पायांनीच वर्गात बसावं लागत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला असून, शिक्षणासोबतच स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.

अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही अद्याप रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनंच मिळाली, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गावच्या पारावरच विद्यार्थ्यांची शाळा भरवून अनोखं आंदोलन केलं. "आता तरी प्रशासन जागं व्हावं," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरात लवकर रस्त्याचं काम हाती न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी शाळेलाच कुलूप ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.