२८ जूनला जिल्हाभर 'दोन थेंब'ची महासुरुवात! २.३० लाख बालकांपर्यंत पोहोचणार पोलिओ प्रतिबंधक लस! बसस्थानकांपासून वीटभट्ट्यांपर्यंत विशेष लक्ष; ६ हजारांहून अधिक कर्मचारी मोहिमेसाठी सज्ज...

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलिओमुक्त भारताचा मान कायम राखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात रविवारी, २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा यंत्रणा सज्ज झाली असून गावागावांत आणि शहरांमध्ये व्यापक नियोजन करण्यात आले आहे.या मोहिमेसाठी जिल्हाभरात सुमारे २ हजार ६९ पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक पात्र बालकापर्यंत लस पोहोचावी यासाठी ६ हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बूथवर लसीकरण झाल्यानंतरही एखादे बालक वंचित राहू नये यासाठी घरभेटींद्वारे विशेष मोहीम राबविली जाणार आहे. शहरी भागात पाच दिवस तर ग्रामीण भागात तीन दिवस घराघरांत जाऊन बालकांची तपासणी व लसीकरण केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिओ हा आयुष्यभरासाठी अपंगत्व निर्माण करू शकणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यावश्यक आहे. पालकांनी कोणतीही हलगर्जी न करता आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे.

माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनीही नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, नियमित लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांनाही पल्स पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

यंदाच्या मोहिमेत बसस्थानके, रेल्वे स्थानके, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, स्थलांतरित मजूर व भटक्या कुटुंबांच्या वस्त्यांमधील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून जनजागृती उपक्रम राबवून प्रत्येक पालकापर्यंत मोहिमेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

"दोन थेंब जीवनाचे" हा संदेश घेऊन येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी २८ जून रोजी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.