शेतीचा विकास म्हणजेच देशाचा विकास! आमदार श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन! अमडापूरात विकसित कृषी संकल्प अभियानानिमित्त साधला शेतकऱ्यांशी संवाद...

 
 अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – “शेती आणि शेतकरी यांच्या समृद्धीवरच भारताच्या विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केले. ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत अमडापूर येथे आयोजित शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमर विद्यालय, अमडापूर येथे करण्यात आले होते. आमदार महाले यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वैज्ञानिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
“काळ्या मातीतून सोनं उगवावं अशी आपली परंपरा आहे. शास्त्रज्ञांचे ज्ञान आता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. 'Lab to Land' ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता कृतीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली जात आहे,” असे त्या म्हणाल्या.
या अभियानाचा मुख्य उद्देश कृषी संशोधन प्रयोगशाळेतील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या उपयोगात आणणे हा आहे. पेरणीपूर्वी शास्त्रज्ञांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, योग्य पीक पद्धती, हवामानाशी सुसंगत वाणांची निवड, नैसर्गिक शेती, संतुलित खतवापर आदी बाबींचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
कार्यक्रमास आयसीएआरचे डॉ. दास, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. झोपे, डॉ. देशमुख, डॉ. तिजारे, तालुका कृषी अधिकारी डॉ. कंकाळ तसेच अमडापूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल साठे आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड आवश्यक असून, हे अभियान त्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही आमदार महाले यांनी सांगितले.