हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची बुलढाण्यात उबाठा शिवसेनेने केली होळी..! जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले,त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली मराठी भाषा संपवण्याचा डाव!

 प्रवक्त्या जयश्रीताई शेळके म्हणाल्या, केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठीच हा चुकीचा निर्णय ...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदी सक्तीच्या नावाखाली भाजपाने एकाधिकारशाहीचा चालवलेला अजेंडा खपून घेतला जाणार नाही. त्रिभाषा सूत्र अमलात आणून मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या वतीने शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली , त्याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संगम चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

 

जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने आज हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनाचे रान पेटवले होते. बुलढाण्यात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर मराठी द्वेषी सरकारचा निषेध असो, महायुती सरकारचं करायचं काय... हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करा.. रद्द करा.. यासह अन्य घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शासन निर्णय ची होळी याप्रसंगी करण्यात आली.
नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन ही सादर करण्यात आले.
महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठीवर अन्याय करणारा एक प्रकारचा निर्णय घेऊन पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती बाबत सरकारच्या तूघलकी निर्णयाचा जनमानसामधून प्रचंड विरोध होत आहे. शिवसेना या निर्णयाच्या ठामपणे विरोधात आहे. आम्ही कदापिही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही. त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने राज्यात पहिल्या वर्गापासून तिसरी भाषा हिंदीला अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा मराठीची गळचेपी करणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र वगळता इतर कुठल्याही राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जात नाहीत. मराठी भाषा अभ्यासक असो वा इतर तज्ञ यांचीही याबाबत तीव्र नाराजी आहे. गैर हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये हिंदीची सक्ती नाही मात्र ती महाराष्ट्रातच का हा खरा प्रश्न आहे? भाजपचा हा छुपा अजेंडा असून हिंदी सक्तीच्या नावाखाली मराठी संस्कृती आणि भाषा संपवण्याचा हा एक प्रकारचा डाव असल्याचेही जालिंदर बुधवत म्हणाले. 
यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका विजयाताई खडसन, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने सर, माजी सभापती सुधाकर आघाव, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजुभाऊ इंगळे, विजय इतवारे, अशोक मामा गव्हाणे, राजु मुळे , रवि राजपूत, गजानन उबरहंडे, आशिषबाबा खरात, अनिकेत गवळी, मोहम्मद सोफियान, रफिक शेठ, संजय शिंदे, संजय दर्डा, हरिभाऊ सिनकर, एकनाथ कोरडे, संजय गवळी, संजय शिंदे, राहुल जाधव,रामू राजपूत, बबन खरे, शाम खडके , श्याम सावळे, स्मिता वराडे, सोनाली वाघ, अश्विनी फदाट, उषा सालोक , पूजा शिंगणे , अनिता गायकवाड , दत्तात्रय जाधव , तानाजी पैठने, दिनकर पांडे, संपतराव पाटील, गणेश सिंग जाधव, निंबाजी भाऊ काळवाघे , यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठीच हा चुकीचा निर्णय : जयश्रीताई शेळके 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बुलढाण्यात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे असे सांगून शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, संपूर्ण जनतेचा या हिंदी सक्तीला विरोध आहे. पहिल्या वर्गापासून हिंदी सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नाही. तशी कुठलीही मागणी विद्यार्थी, जनतेची किंवा पालकांची नाही. केवळ आणि केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी हा सक्तीच्या हिंदीचा निर्णय राज्यातील महायुती सरकार कडून घेण्यात आला आहे, असा घणाघात शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केला. एकाधिकारशाहीचे हे धोरण असून हिंदीशक्ती आम्ही लादू देणार नाही. या संदर्भात प्रशासनाचा रेटा करून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या डाव आखण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. हा चुकीचा निर्णय आहे , महाराष्ट्रात हा निर्णय लागू करू नये अशी आमची मागणी आहे. प्रसंगी आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.