पुढचे ३–४ दिवस भयंकर उष्णतेची लाट! दुपारी बाहेर निघू नका; लेकरांची काळजी घ्या! यंत्रणेकडून अलर्ट! काय करायचं आणि काय नाही हे स्पष्टच सांगितलं....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने १३ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत अकोला –बुलडाणा  जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ आणि राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन  प्रशासनाने केले आहे.दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे या काळात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. वाहन चालवताना काळजी घ्यावी आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी तहान लागलेली नसली तरी वारंवार पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशक्तपणा, डोकेदुखी, गरगरणे, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे ओळखून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. लहान मुले, वृद्ध तसेच पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात त्यांना ठेवू नये. पशुधनासाठी सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत उष्णतेपासून बचावासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे प्रशासनाने सांगितले आहे.


काय करावे

* सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ८ या वेळेतच बाहेरील कामे करावीत
* भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे
* ORS व इलेक्ट्रोलाइट्सचा वापर करावा
* डोक्यावर टोपी, गमछा किंवा स्कार्फ वापरावा
* हलके, सैल व फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत
* शक्यतो सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्यावी
* उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
* कामगारांनी एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

काय करू नये

* दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात काम करू नये
* तहान लागेपर्यंत पाणी पिणे टाळू नये
* जास्त वेळ थेट उन्हात उभे राहणे टाळावे
* जड, घट्ट किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत
* कॅफिन, मद्य किंवा साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे
* थकवा जाणवत असतानाही जबरदस्ती काम करू नये
* उष्णतेची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत
* लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींना उन्हात सोडू नये
* रिकाम्या पोटी किंवा कमी पाणी घेऊन काम सुरू करू नये