मुरादपुरच्या गावगाड्याचे राजकारण तापले! उपसरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; चौघांचा रोष सरपंचांवर!  ग्रामसेवक म्हणतात राजीनाम्याची सत्यता पडताळणी बाकी

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गावपातळीवरील ग्रामपंचायत चे राजकारण कधी तापेल याचा नेम नसतो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी ते तापतेच शिवाय त्यानंतरच्या ५ वर्षात अनेकदा सरपंच ,सदस्यांच्या कारभारावरून खटके उडत असतात. चिखली तालुक्यातील मुरादपुरच्या ग्रामपंचायतीचे राजकारण सध्या तापलेय. ग्रामपंचायत निवडणुका होऊन २ वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतांनाच सरपंच आणि उपसरपंच व काही सदस्यांमध्ये खटके उडाले आहेत. सरपंच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत उपसरपंचासह ४ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

 मुरादपुर येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंचासह ७ सदस्य आहेत. सौ. ज्योती अनंथा गाडेकर या सध्या सरपंच असून ४ सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवली आहे.उपसरपंच विष्णू भगवान गाडेकर , ग्रामपंचायत सदस्य अंजली समाधान जाधव, उषा ज्ञानेश्वर गाडेकर, राधा रमेश जाधव यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत.
    
राजीनाम्याची सत्यता पडताळणी बाकी..

 ग्रामपंचायत सदस्यांनी नियमानुसार राजीनामे हे सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे द्यायचे असतात. मात्र "त्या" दिवशी आपण सुट्टीवर असल्याने राजीनामे ग्रामपंचायत शिपायाकडे देण्यात आले. सध्या राजीनाम्याची सत्यता पडताळणी बाकी आहे, ग्रामपंचायत कार्यकारिणीची सभा बोलावून त्यात राजीनाम्याची सत्यता पडताळण्यात येईल, राजीनाम्यावर केलेल्या स्वाक्षऱ्या तपासल्या जातील त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे मुरादपुर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक विनायक वायाळ यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.