वन्य प्राण्याच्या हल्ल्यात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू; आमदार संजय गायकवाडांकडून ₹५० हजारांची तात्काळ मदत!

 शासनाकडून सर्वतोपरी मदतीसाठी पाठपुराव्याची ग्वाही; अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न...
 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा तालुक्यातील सारोळापीर येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गोपाल वासुदेव बावस्कर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने दुःखाच्या छायेत असलेल्या बावस्कर परिवाराचे सांत्वन करत त्यांनी स्वतःच्या निधीतून रोख ₹५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून मिळणारी सर्व मदत तातडीने मिळवून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.मृताच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. हे दुःख भरून काढणे शक्य नाही. मात्र या कठीण काळात तुमचे कुटुंब एकटे नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

 यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबाला रोख ₹५० हजारांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याप्रकरणी शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई, इतर आर्थिक सहाय्य आणि सर्व शासकीय लाभ तातडीने मिळावेत, यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

याशिवाय, कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत राहावा यासाठी स्वर्गीय गोपाल बावस्कर यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.घटनेनंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरात वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गस्त वाढविणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी आरएफओ आळसपुरे, वनपाल साळोख, वनरक्षक राठोड यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाधित कुटुंबांना तातडीची मदत, योग्य नुकसानभरपाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अशा कठीण प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी दाखविलेली संवेदनशीलता, तात्काळ आर्थिक मदत आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी दिलेली आश्वासने हा शोकाकुल परिवारासाठी मोठा आधार ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.