लोणारच्या प्रसिद्ध लेंडीतलावाचे होणार पुनरुज्जीवन! आ. संजय रायमुलकरांच्या पाठपुराव्याला यश.. 

 
लोणार (प्रेमसिंगी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार येथील प्रसिध्द लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून १७ कोटी ४६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या संदर्भातील शासनादेश देखील निर्गमित करण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. 
 सध्या लोणार विकास आराखड्यातील अनेक कामे सुरू असून जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे पर्यटनदृष्ट्या मोठया संख्येने पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी आराखड्यातील कामांना मंजुरी मिळवून घेतली. यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न सुरू केले . अमृत २.० अभियानातून लेंडी तलावाचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरण प्रकल्पास मंजुरी देण्याची मागणी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी केली होती. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता १७ कोटी ४७ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली. केंद्र, राज्यशासन यांचे अनुदान आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा काही हिस्सा यातून प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांनी दिलेल्या तांत्रिक आराखड्यास राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पास मंजुरी मिळाली. लेंडी तलाव पुनर्जीवन, संरक्षक भिंतीचे बांधकाम, पॅरापीट रेलिंग, कॉक्रिट रस्ता, नाल्या बांधकाम, पदपथ, इमारत, सांडवा, पूल, जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान, फेब्रिक टेंट आदी कामे या प्रकल्पासाठी होणार आहेत. नगरपालिकेला यात ८७ लाख रुपयांचा हिस्सा भरावा लागणार आहे. यात आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, सर्व जागा नगर परिषदेच्या ताब्यात असल्याची खात्री केल्यानंतर प्रकल्पाचा कार्यारंभ होणार आहे. आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची राहणार आहे. या प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी आभार मानले आहेत. लोणार सरोवर जसे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तसेच लोणार शहरासह लोणार तालुक्याला ही जलसंस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ह्या असे ऐतिहासिक प्रकल्प जपत खंबीरपणे उभ्या आहेत. मात्र मानवी हस्तक्षेप होत असल्याने ही जलसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ. प्रा. सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुरावेसह त्यांच्या पुस्तकामधून लेख मांडले आहेत. शहराच्या जवळ असलेले सद्या लेंडी तलाव नावाने ओळख असलेल्या तलावाला नागार्जुन तलाव, लिंबी तलाव नावानेहही ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या तलावात अनेक वर्षापासून शहराचे घाण सांडपाणी सोडले जात आहे. दुर्लक्षित तलावात कचऱ्याच्या ढीगारे वाढीस लागले होते. मराठवाड्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरच असलेल्या ह्या तलावाजवळून जात असताना नागरिक नाक मुरडत जातात. लोणार नगर परिषदने अनेक वर्षापासून तलाव परिसरातील स्वच्छता न केल्याने याबाबत लोणारकरांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. ऐरवी कचऱ्याने वेढलेला लेंडी तलावाचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरण झाल्यास पूर्वीच्या नागार्जुन तलावा सारखं रूप धारण केल्यासारखे जाणवणार आहे. यामुळे तलावाच्या सुशोभिकरणाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्वच्छ व सुंदर शहर अभियान व तलावाचे सुशोभिकरण केल्यास नागरिकांच्या सोयीसाठी तलाव व सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होऊ शकते. तलाव परिसरात पदपथ सुशोभीकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजीटल चित्रदर्शन, खुला रंगमंच, सेल्फी पाँईंट, अत्याधुनिक व आवश्यक विद्युत व उद्यानविषयक विविध कामे झाल्यास शहराच्या सौंदर्य करणात चार चांद लागू शकतात. यामुळे लोणार नगर परिषदने तलाव परिसरात साफसफाईवर भर देऊन तसेच तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाचाही नारळ फोडून तलावाला हायटेक लुक देण्यासाठी पुढाकार घेत शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा अपेक्षा लोणारकरांनी व्यक्त केल्या आहेत.