आणीबाणीत तुरुंगात गेलेले भारतीय हेच लोकशाहीचे खरे रक्षक! आ. श्वेताताई महाले! महायुती सरकारने आणीबाणीतील योद्ध्यांचा केला सन्मान ! मानधन केले दुप्पट!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): “आणीबाणीच्या काळात भारतीयांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जो त्याग केला, त्याचे चीज आता होत असून, हेच खरे लोकशाहीचे रक्षक आहेत,” असे उद्गार आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी काढले. महायुती सरकारच्या निर्णयाचे चिखलीत मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.

२५ जून १९७५ रोजी देशात लादलेल्या आणीबाणीच्या निर्णयाने लोकशाहीचे गळा घोटण्याचे काम झाले. या काळात लाखो लोकांनी अन्यायकारक कारवाईला तोंड दिले. माध्यमांवर बंदी घालण्यात आली, विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले. या हुकूमशाही विरोधात उभे राहत कारावास पत्करलेल्या व्यक्तींनीच भारतातील लोकशाही जिवंत ठेवली, असे आमदार श्वेता महाले म्हणाल्या.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता महिनाभराचा तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा २० हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात जोडीदाराला १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
ही योजना प्रथम मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झाली होती. २०१८ मध्ये अशा बंदीवानांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्या निर्णयात वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयाबद्दल चिखली तालुक्यातील आणीबाणी बंदीवानांनी आमदार सौ. श्वेताताई महाले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच महायुती सरकारचे आभार मानले. या भेटीत प्रल्हाद रामराव भुतेकर, पुंडलिक बाजीराव महाले, बलदेवसिंग जुलालसिंग सपकाळ, बळीराम एकनाथ परिहार, रामदास कडूबा जोशी, साहेबराव संपत महाले, सहदेव नामदेव महाले, लक्ष्मण पुंडलिक सोळंकी, भगवान विष्णू करवंदे, देविदास किसन महाले, महेंद्र नागोराव गवळी आदी योद्धे उपस्थित होते.
या निर्णयामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या खऱ्या शूरवीरांचा सन्मान अबाधित राहील, असा विश्वास आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.