हनुमान सागर धरणात 91 टक्के जलसाठा, दोन दरवाजे 50 सेंमीने उघडले ! 
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ! 

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अकोला,बुलढाणा अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान सागर धरणात 91 टक्के जलसाठा असून दोन दरवाजे आज 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रत्येकी 50 सेंमीने उघडण्यात आले. त्यामुळे वान नदी काठावरील गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.

सातपुड्याची पायथ्याशी असलेल्या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील हनुमान सागर वानप्रकल्प आहे. गत काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाणी झपाट्याने वाढले आहे. मध्यंतरी अपेक्षित पाऊस न झाल्याने धरण भरते की नाही, अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाच्या जोरदार आगमनामुळे धरणात जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.वान प्रकल्प धरणात 91 टक्के जलसाठा झाल्याने आज सोमवारी सकाळी 11 वाजता 2 दरवाजे 50 सेमी उंचीने 82.73 क्युमेस्क उघडण्यात आले आहे. वान प्रकल्प पुर नियंत्रण कक्ष विभागाने नदीकाठच्या गाव निहाय स्थानिक प्रशासनाला सुचित केले आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढत आहे.

त्यामुळे धरणातून वान नदीपात्रात 82.73 क्युमेस्क  इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावध राहावे तसेच नदीपात्र ओलांडू नये, पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल. वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष विभागाच्यावतीने  वान नदी काठावरील गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.