मेहकर–लोणार तालुक्यांना न्याय द्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका!”आ. सिद्धार्थ खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जून २०२५ मधील भीषण ढगफुटी आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसलेले मेहकर आणि लोणार तालुके राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या २५३ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संताप उसळला आहे.
या अन्यायकारक निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून मेहकर व लोणार तालुक्यांचा तत्काळ समावेश करण्याची मागणी केली आहे.
आ. खरात यांनी पत्रात नमूद केले आहे की, २५ व २६ जून २०२५ रोजी मेहकर तालुक्यात तब्बल २१० मिमी पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे मेहकर तालुक्यातील सर्व ११ व लोणार तालुक्यातील ५ अशा एकूण १६ मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. नद्या, नाले, ओढे तुडुंब वाहून गेल्याने हजारो हेक्टर शेतजमिनीवर गाळ साचला असून सुमारे ६६,००० हेक्टर शेतीयोग्य जमीन निकामी झाली आहे.
शासन निर्णय २७ मार्च २०२३ नुसार नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू असली, तरी हेक्टरी मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे खरात यांनी स्पष्ट केले. त्यांनी हेक्टरी किमान ५०,००० रुपये मदत, तसेच बुजलेल्या विहिरी, तुषार सिंचन संच, पाईपलाइन, फळबागा आणि बागायती जमिनींचा समावेश नुकसान भरपाई योजनेत करण्याची मागणी केली आहे.
“ढगफुटीची पहिली झळ मेहकर आणि लोणार तालुक्यांनी सोसली, तरी शासनाने या भागांचा समावेशच केला नाही! हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा अन्याय आहे,” असे खरात यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन दिवसांत सुधारित शासन निर्णय जाहीर करून या दोन्ही तालुक्यांचा समावेश करावा, तसेच संबंधित विभागांना तत्काळ निर्देश द्यावेत, अशी पुनश्च विनंती केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या कडे दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,माजी सभापती भास्करराव गारोळे,तालुका प्रमुख निंबाजी पांडव,शहर प्रमुख किशोर गारोळे,माजी जि.प. सदस्य दिलीप वाघ, युवा सेना तालुका अधिकारी ॲड आकाश घोडे, लोणार तालुका समन्वय तेजराव घायाळ, तालुका प्रमुख राजुभाऊ बुधवत,ॲड संदीप गवई, शहर अधिकारी ऋषी जगताप, विलास शिंदे, पंडित बापू देशमुख, सर्कल प्रमुख गजानन राठोड ,अमोल बोरे,नगमा गवळी, आरती देशमुख, संतोष लाड,कडुबा शेजुळ, समाधान ठाकरे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठल चव्हाण रफिक गवळी, स्वप्निल हाडे, पवन टाले, दीपक गायकवाड, प्रकाश मानवतकर,जावेद भाई खान छगन सांगोळे, ध्यानेश्वर पातले गणेश गावंडेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.