कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी १० जूनला शेगावात शेतकऱ्यांचा एल्गार; रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार
Updated: Jun 9, 2025, 08:30 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि थकीत पीक विम्याच्या तातडीने वाटपासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने १० जून रोजी संतनगरी शेगावमध्ये शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर सरकारला धारेवर धरणार आहेत...
या शेतकरी एल्गार मेळाव्याद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्षाची दिशा ठरवली जाणार आहे. या वेळी संपूर्ण कर्जमाफी, अद्याप मिळालेला नाही असा पीकविमा तातडीने खात्यावर जमा करणे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, सक्तीची कर्जवसुली थांबविणे, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण आणि शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांचा एल्गारात पुन्हा उच्चार होणार आहे.
राज्यभर एल्गार मेळाव्याची मालिका..
रविकांत तुपकर यांनी राज्यभरात शेतकरी एल्गार मेळाव्याची मालिका सुरू केली असून, नाशिक, सिन्नर, संगमनेर, शिक्रापूर, कर्जत, पंढरपूर, कोल्हापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड आदी भागात त्यांनी दौरे केले आहेत. २७ मे रोजी सिंदखेडराजा येथे झालेल्या मेळाव्यातही त्यांनी सरकारविरोधात तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
शेगावात विदर्भातील निर्धार..
शेगावच्या सभेला विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असून, ज्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही त्यांनी आपली विमा पावती घेऊन सभेला यावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. "कर्जमुक्ती हक्काची, पीकविमा न्यायाचा" हे ब्रीद घेऊन होणाऱ्या या एल्गारात शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी एकजूट दाखवण्यात येणार आहे.