मुंबईत शेतकऱ्यांचा एल्गार यशस्वी! आंदोलनाच्या तडाख्याने सरकारला अखेर चर्चेच्या टेबलावर यावे लागले;
आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकरांची निर्णायक बैठक, गिरीश महाजनांचा तुपकरांना बैठकीचा निरोप...
आज सकाळपासूनच विधानभवन परिसर रणांगण बनला होता. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधानभवनावर धडकले. कडेकोट पोलीस बंदोबस्तालाही न जुमानता आंदोलनकर्त्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने भिरकावण्यात आल्या, तर सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारच्या आश्वासनांचा निषेध करण्यात आला. काही क्षणांतच संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला.
यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, ही कारवाई सरकारलाच उलटी पडल्याचे चित्र दिसले. तुपकर ताब्यात गेल्यानंतर आंदोलन आणखी भडकले.
मंत्रालयासमोरील दोन मोठ्या झाडांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चार कार्यकर्ते चढले. गळ्यात फास अडकवून त्यांनी सरकारने बैठक जाहीर करेपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा अनेक तास घटनास्थळी ठाण मांडून आंदोलकांना उतरवण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र सगळे प्रयत्न निष्फळ झाले.एकीकडे झाडावरील जीवघेणे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे काही शेतकरी मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात उतरले. एका मागोमाग एक उभ्या राहिलेल्या आंदोलनांमुळे मंत्रालय, विधानभवन आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
बैठिकचा निरोप..
अखेर वाढत्या दबावानंतर सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांना दूरध्वनी करून दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती दिली. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
तुपकरांचा आंदोलकांना फोन, तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा...
सरकारसोबत बैठक लावण्यात आल्याचा निरोप आल्यानंतर आझाद मैदानातून रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोरील झाडावर चढलेल्या आंदोलकांशी फोनवरून संपर्क केला. "तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, लढणारी माणसं टिकली पाहिजेत" असे तुपकर यांनी आंदोलकांना सांगितले. तुपकरांचा संदेश मिळताच मंत्रालयासमोरील झाडांवर आंदोलन करणारे कार्यकर्ते खाली उतरले. सलग अनेक तास सुरू असलेल्या या संघर्षानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची दिशा आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीवर अवलंबून असणार आहे.
जून महिन्यातील अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी पुन्हा मुंबईत संघर्ष उभा केला. या वेळी विधानभवनापासून मंत्रालय आणि मरीन ड्राईव्हपर्यंत आंदोलनाचा विस्तार झाल्याने शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. आता दुपारच्या बैठकीत सरकार केवळ आश्वासने देते की ठोस निर्णय जाहीर करते, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.