समाजपरिवर्तनाच्या माध्यमातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली! कृष्णाजी सपकाळ यांचे प्रतिपादन!
बुलढाण्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा संपन्न....
Jun 6, 2025, 17:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपला जन्म राजा होण्यासाठी नव्हे तर चाकरी करण्यासाठी झाला आहे. आपण राजा होऊ शकत नाही. मोगल, निजामशाही, आदिलशाहीची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे अशा गुलामीच्या मानसिकेत अडकलेल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन दिशा दिली. समाजाच्या संघटित शक्तीची ताकद दाखवून देत समाजाला "स्व– बोध" करून दिला. गुलाम मानसिकतेच्या तत्कालीन समाजाचे परिवर्तन शक्ती संपन्न आणि स्वाभिमानी समाजात केले. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा पाया हा समाज परिवर्तनाच्या आधारावरच उभा राहिला असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कृष्णा सपकाळ यांनी केले. बुलढाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात राज्य सरकारच्या कौशल्य विकास व नाविन्यता मंत्रालयाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कृष्णा सपकाळ बोलत होते. यावेळी आयएमसी ऑफ आयटीआय बुलढाणा चे अध्यक्ष नितीन जयस्वाल, प्राचार्य प्रा. विष्णू बचाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, वाहतूक शाखेचे श्री.भुसारी, उत्कर्ष डाफणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्या व्याख्यानात कृष्णा सपकाळ यांनी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी या मुद्यांवर प्रकाश टाकले. पुढे बोलतांना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणीच कौटुंबिक प्रबोधनातून झाली. एकत्र कुटुंब पद्धती हा भारतीय समाजमनाचा आत्मा आहे. भारताची ओळख कुटुंब आहे, त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीच्या आहारी जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाकडे विशेष लक्ष दिले, शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या आज्ञापत्रात त्यांनी सैनिकांना आरमारासाठी कोणती झाडे तोडावीत आणि कोणती तोडू नये याबद्दल स्पष्ट लिहिले आहे.
याशिवाय झाडांच्या लागवडीकडे देखील महाराजांनी विशेष लक्ष दिले. सध्या जागतिक तापमान वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे, भारत हा जगाला दिशा देणारा देश आहे. त्यामुळे पर्यावरण समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे असेही कृष्णा सपकाळ म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्यांनी कधी कुठल्या मावळ्याचे त्याच्या जातीवरून महत्त्व ठरवले नाही. त्यामुळे भारताला महासत्ता बनवायचे असेल तर जातपात धर्मपंथ पक्ष असा भेदभाव विरहित समाज निर्मिती करावी लागेल. "मी माझ्या मित्राला जात विचारणार नाही, मी कुणाशीही जातीय मानसिकतेतून वागणार नाही" असा संकल्प प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांना समोरून केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज व्यवहारकोष सुरू केला. छपाई चे तंत्रज्ञान स्वराज्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्वराज्यात उद्योग,व्यवसाय, व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. याचाच आदर्श औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांनी घेतले पाहिजे. स्वदेशी वस्तूंच्या वापराचा आग्रह आपण धरला पाहिजे. आयात करण्यापेक्षा निर्यातीवर आपला भर असला पाहिजे, त्यासाठी सगळ्या प्रकारचे तंत्र आत्मसात करून आत्मनिर्भर भारतासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाआधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर पलसिद्ध महास्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुलढाणा असे करण्यात आले...