खरीप हंगामात विशिष्ट बियाणे व खताचा अट्टहास टाळा; कृषि विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला...

 
 बुलडाणा(जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकरी बंधू मशागतीसह बियाणे व खते खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कृषि विभागाने महत्त्वाचे आवाहन करत शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे किंवा रासायनिक खतांचा आग्रह टाळावा, असा सल्ला दिला आहे.
कपाशी आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, यंदा काही भागांमध्ये विशिष्ट वाणांची मागणी वाढताना दिसत आहे. मात्र, सर्वच प्रमाणित वाण हे उत्पादनक्षम असून, त्यांच्यातील उत्पादन क्षमतेत फारसा फरक नसल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे. कपाशीच्या सर्व वाणांमध्ये समान बिटी जैव तंत्रज्ञान असून सर्व वाणांमधील उत्पादनक्षमता जवळपास सारखीच आहे.
सोयाबीनच्या बाबतीत स्वपरागीकरण होत असल्याने दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा वापरलेले बियाणे योग्य प्रकारे साठवून व संवर्धन करून तीन वर्षांपर्यंत वापरता येते. यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यावर होणारा खर्च देखील कमी होतो.
बियाणे निवड करताना अधिकृत ठिकाणांवरूनच खरेदी करावी. नेहमी पक्के बिल घ्यावे व लेबलवरील लॉट नंबर आणि बिलातील नंबर पडताळावा. घरच्या बियाण्याची योग्य चाळणी, उगवण चाचणी आणि बीजप्रक्रिया करून वापर केल्यास उगवणीबाबत तक्रार राहणार नाही. १०० मिलीमीटर पावसाच्या नोंदीनंतर २ ते ३ सेंटीमीटर खोलीवर पेरणी करावी.
कपाशी पिकासंदर्भात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १ जूननंतरच लागवड करावी, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
पिकांचे उत्पादन केवळ बियाण्यावर नाही तर जमिनीचा पोत, वेळेवर मशागत, योग्य पावसाचे प्रमाण यावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून संतुलित दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.