खेर्डा येथील शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीसह किडनी विक्रीची परवानगी..!

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततची नापिकी आणि अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत गांजा लागवड व किडनी विक्री करण्याची रितसर परवानगी देण्याची मागणी खेर्डा खुर्द आणि खेर्डा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झाला आहे. सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता स्वतःची किडनी विकण्याशिवाय किंवा शेतीत गांजा पीक लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. २०२४ चा पीकविमा मंजूर होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होत नाही. शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन व कापसाचे हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे अनुदान अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. मागील दोन महिन्यांपासून सततचा पाऊस सुरू असून त्यामुळे कपाशीची बोंडे सडून गळत आहेत. सोयाबीनच्या शेतातपा वसाचे पाणी साचल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहिल्या आहेत

मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, भुईमूग, कांदा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खेर्डा बुद्रुक व खेर्डा खुर्द या गावातील पंचनामे होऊनही अहवाल निरंक सादर केल्यामुळे शेतकरी वंचित राहणार आहेत.
एकंदरीत अडचणीत सापडल्याने किडण्या विकण्याची व शेतात गांजा लागवड करण्याची रितसर परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण भोपळे, वासुदेव राजनकर, दिलीप भोपळे, महादेव वानखडे, समाधान गिडे, तुळशीराम खिरोडकर, श्रीरंग खिरोडकार, प्रमोद तायडे, देवीदास तायडे, आनंदा तायडे, मनोहर म्हसाळ, सुभाष राजनकार, ओमप्रकाश वानखडे, कमला म्हसाळ यांनी केली आहे.